“अजित पवार यांच्यावर शरद पवार यांचाच विश्वास राहिला नाही”; भाजपच्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य
उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला
सातारा : राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर त्यांचे काका म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाचे अधयक्ष शरद पवार यांचाच विश्वास नाही, जनता कशी ठेवणार, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी लगावला आहे. ते सध्या सातारा लोकसभा मतदार संघाचा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कराड येथे पत्रकारांशी संवाद साधला.
राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला आम्ही गांभीर्यानं घेत नाही. कारण, त्यांच्याच पक्षातील लोक राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाहीत, तसंच अजित पवार यांनीच दबावतंत्र वापरून विरोधी पक्ष नेतेपद मिळवलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही वाटाघाटी करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या काकांचाच विश्वास त्यांच्यावर राहिला नाही. भारतीय जनता पक्ष साताऱ्यासह सर्व महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे, असं अजयकुमार मिश्रा म्हणाले.
तीन वर्षात इडीनं केलेल्या कारवाईतून देशाला तीनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे. ईडीचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप निराशेच्या भावेतून होत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मिरमधील 370 कलम हटविण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांची संख्या कमी झाली असून, या ठिकाणी पर्यटनास चालना मिळाली आहे. याचबरोबर चीन सीमा भागातील चांगली सुरक्षा यंत्रणा असून, एक इंचही चीन अतिक्रमण करू शकच नसल्याचेही अजयकुमार मिश्रा म्हणाले.
भाजप सतत काम करणारा पक्ष आहे. देशातील सर्व धर्मीय लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे लक्ष्य ठेवून पक्ष काम करत आहे. देशाच्या सेवा, सुरक्षा, आर्थिक, सांस्कृतीक, ऐतिहासिक प्रश्नांवर काम सुरू असल्यामुळेच भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आहे. देशांतर्गत समस्या सोडवून जागतिकस्तरावर देशाला समृद्ध, शक्तिशाली बनवण्याचे काम भाजप करत आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला आहे. ठाकरेंमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत अडथळा आला असून, महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला आहे. महाराष्ट्राला यापुढे प्रगतिपथावर नेण्यासाठी काम करणाऱ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाची वाटचाल सुरू आहे, असही अजयकुमार मिश्रा म्हणाले.