‘मिराज २०००’ विमानांनी कारगिल युद्धात निर्णायक भूमिका बजावली
कारगिल युद्धाच्या वेळी १२ दिवसांच्या विक्रमी मर्यादेत मिराज २००० जेट विमानांवर लक्ष्य निश्चिती प्रणाली (टार्गेटिंग पॉडस) व लेसर नियंत्रित बॉम्ब जोडून ती सज्ज करण्यात आली होती, मिराज २००० विमानांमुळेच या युद्धात पारडे भारताच्या बाजूने फिरले, असे एअर चिफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी सोमवारी कारगिल युद्धाच्या विसाव्या स्मरण दिनानिमित्त सांगितले.
ग्वाल्हेर हवाईतळावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की मिराज २००० विमानांचे आधुनिकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ती विमाने कारगिल युद्धात वापरण्यात आली. त्यात लक्ष्य निश्चिती यंत्रणा व लेसर नियंत्रित बॉम्ब १२ दिवसात विमानांना जोडण्यात आले. १९९९ मधील कारगिल युद्धात मिराज २००० विमानांनी पायदळाला जो भक्कम पाठिंबा दिला त्यामुळेच पारडे भारताच्या बाजूने फिरले.
बालाकोट हल्ला व त्यानंतरच्या घटनांबाबत विचारले असता ते म्हणाले,की पाकिस्तानी विमाने आपल्या हवाई हद्दीत येऊ शकली नाहीत त्यामुळे त्यांना भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले करता आले नाहीत. पण त्याआधी आम्ही बालाकोट येथील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले.
भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान अरुणाचल प्रदेशात अपघातग्रस्त झाल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले,की एएन-३२ विमाने पर्वतीय भागात यापुढेही काम करीत राहतील कारण सध्या तरी या विमानांना पर्याय नाही. आमची आधुनिक विमाने मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर एएन-३२ विमाने निकाली काढली जातील.