येडियुरप्पांनी राज्यपालांकडे केला दावा
बंगळुरू – भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस येडियुरप्पा यांनी आज सकाळी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला. आमच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने आम्हालाच सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी असे त्यांनी राज्यापालांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
भाजप विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ते थेट राजभवनावर गेले आणि त्यांनी आपला दावा सादर केला. आपल्याला शक्य तितक्या लवकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ द्यावी अशी विनंती आपण राज्यपालांना केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यावर आपण योग्य वेळी निर्णय घेऊ अशी ग्वाहीं राज्यपालांनी आपल्याला दिल्याचे त्यांनी सांगितले. ते आम्हालाच प्रथम संधी देतील असा आपल्याला शंभर टक्के विश्वास आहे असेही येडियुरप्पा यांनी सांगितले.
अपक्ष आमदार शंकर यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले असून ते पत्रही आपण राज्यपालांकडे दिले आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील ज्येष्ठ भाजप नेते सुरेशकुमार आणि के. एस. ईश्वरअप्पा यांनीही भाजप बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.