दिंडीप्रमुखाच्या भेटवस्तू बंद?; आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना शिक्षणास करणार मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/DSC_4649.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत आज (शनिवारी ) पिंपरी-चिंचवड महापालिकेत संयुक्त आढावा बैठक पार पडली. आषाढीवारीतील वारक-यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या. तसेच दरवर्षी पालखी सोहळ्यातील दिंड्याप्रमुखांना भेटवस्तू देण्याची प्रथा बंद करण्यात येणार असून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना शिक्षणास मदत द्यावी, अशा सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यावर महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
महापालिकेत महापौर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, मधुकर महाराज मोरे आदी उपस्थित होते.
आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पुरेशी सुरक्षा व्यवस्था, फिरते शौचालय यांची व्यवस्था कराव्यात. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन बारी साठीची योग्य ती व्यवस्था करावी. पालखी मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. कचराकुंड्या स्वच्छ ठेवाव्यात. सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेप्रमाणे दुचाकीधारक आरोग्य दुत ठेवण्याची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील मटण व दारुची दुकाने बंद ठेवावेत. पाण्याचे टँकर, वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका आणि या वर्षी दोन्ही सोहळ्यात अग्निशमन बंब पंढरपूरपर्यंत पुरवावेत, असा सूचना करण्यात आल्या. तसेच, निगडी ते दापोडी दरम्यान मेट्रोचे काम सूरु आहे. हे काम दोन दिवस थांबविले जाणार आहे. मुक्कामाच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर येथेही वारक-यांच्या मुक्काची सोय करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.