आरटीईतून दोन हजार मुलांना प्रवेश, 10 मे पर्यंत पुन्हा मुदतवाढ
पिंपरी – शहरात पहिल्या फेरीत सुमारे दोन हजार 20 मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. परंतु, एक हजार 237 पालकांना प्रवेश पत्र मिळूनही त्यांनी शाळांशी संपर्क साधला नसल्याने कोटा अपूर्ण राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच आरटीई प्रवेशप्रक्रियेला शुक्रवारपर्यंत (ता. 10) दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात 172 शाळांमधून तीन हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी 22 हजार 260 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कोट्यातील प्रवेशासाठी पहिल्या सोडतीमध्ये तीन हजार 257 मुलांना लॉटरी लागली. त्यापैकी दोन हजार 20 मुलांचे प्रवेश घेण्यात आले. पडताळणी समितीने अद्याप एकही अर्ज नाकारला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, सुमारे एक हजार 237 मुलांच्या आई-वडिलांनी संबंधित शाळांमध्ये संपर्कच साधला नसल्याचे पडताळणी समिती सदस्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी विभागातून डॉ. डी. वाय. पाटील स्कूलविषयी तीन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु, पडताळणी समितीच्या सदस्यांनी संपर्क साधून कागदपत्रांमधील त्रुटी दूर करून पालकांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. काळेवाडीतील बेबी इंग्लिश स्कूलला उन्हाळी सुटी असल्याने ती बंद असल्याची तक्रार पालकांची होती, त्यामुळे प्रवेश कधी मिळणार अशी भीती पालकांना सतावत आहे. पहिल्या फेरीत एक किलोमीटरपर्यंतच्या शाळा दिल्या असल्याने अनेक पालकांचा गुगल मॅपिंगमुळे पत्ता चुकला.
परिणामी जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारत आहेत. काही शाळा विविध कागदपत्रांच्या त्रुटी काढून प्रवेश नाकारत आहेत. पालकांना चांगली वागणूक न देता अपमानित करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाल्याच्या तक्रारी आहेत. काहींकडे मोबाईल नसल्याने निवडीचा निरोप वेळेत न मिळाल्याची समस्यादेखील आरटीई प्रवेशात ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेली आहे. ज्या मुलांना पहिल्या फेरीत संधी मिळालेली नाही, त्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. 10) कागदपत्रांची पूर्तता करून प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.