राज्यात दिवसाचे तापमान वाढणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Temperature.jpg)
विदर्भाच्या परिसरामध्ये समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे पावसाला पोषक स्थिती असून, विदर्भात तुरळक ठिकाणी रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
राज्यात सध्या बहुतांश भागात निरभ्र आकाशाची स्थिती असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १३ ते १६ एप्रिल दरम्यान पावसाने हजेरी लावली.
काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यापूर्वी सर्वच ठिकाणी कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे गेला होता. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विक्रमी तापमानाची नोंद होत कमाल तापमान ४० ते ४५ अंशांपर्यंत गेले होते.
पावसाच्या सरींनंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली होती. मात्र, सध्या हळूहळू तापमानात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भात वादळी पावसाची शक्यता
राज्यात इतर ठिकाणी कोरडे हवामान असले, तरी विदर्भात अद्यापही पावसाळी स्थिती आहे. त्यानुसार गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, आणि वर्धा या जिल्ह्यंत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भात सध्या बहुतांश ठिकाणी ४० ते ४१ अंशांवर कमाल तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात मालेगाव आणि सोलापूरमध्ये ४० अंश, तर इतर ठिकाणी ३७ ते ३८ अंशांवर तापमानाचा पारा आहे. मराठवाडय़ाच्या तापमानातही सध्या काहीशी घट आहे. कोकण विभागातील दिवसाच्या तापमानाचा पारा ३३ ते ३४ अंशांवर आहे.