राज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून
३३ ड्रोन; २७१ कोटी रुपयांचा निधी
राज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. ही मोजणी येत्या मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ाला एक याप्रमाणे ३३ ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार असून, या कामासाठी २७१ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचा प्रकल्प राज्यभर राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बाबतचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावातील गावठाणाची मोजणी गेल्या वर्षी मार्च महिन्यात ड्रोनद्वारे करण्यात आली होती. हा पथदर्शी प्रकल्प आता राज्यभर राबवण्यात येणार आहे. देशात अशा प्रकारे मोजणी करण्याचा पहिलाच प्रयोग या निमित्ताने होत आहे.
पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावाची मोजणी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे केल्यानंतर गावातील नागरिकांना काही दिवसांत जमिनीची सनद देण्यात आली होती. तसेच गावातील मिळकतीचे नकाशे लवकर तयार करण्यात यश मिळाले होते. ड्रोनद्वारे मोजणी केल्यानंतर गावातील प्रत्येक भूखंडधारकाला त्याच्या भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्काचा पुरावा म्हणून मिळकत पत्रिका कमी कालावधीत उपलब्ध होणार आहे. या मोजणीमुळे कामात मानवीय हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता येणार आहे. मिळकत पत्रिकांमुळे ग्रामपंचायतींना कर आकारणेही सोयीचे होणार आहे.
मोजणीच्या कामाची तयारी सुरू
मार्च महिन्यापासून मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ४० हजार गावठाणांची मोजणी ड्रोनच्या माध्यमातून करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने मोजणीच्या कामाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हय़ासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडे एक ड्रोन देण्यात येईल. तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मोजणीसाठी राज्य सरकारने २७१ कोटी रुपये मंजूर केले आहेत, तर नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रतिसनदेसाठी कमाल एक हजार रुपये खर्च येणार आहे. या सनदेच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम राज्य सरकारकडे परत जमा करण्यात येणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाचे संचालक, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
अशी होते ड्रोनद्वारे मोजणी
ज्या गावात मोजणी करायची आहे, त्या गावातील घरमालकांना सीमा चिन्ह देण्यात येते. हे चिन्ह घराबाहेर कोठे आणि कसे ठेवायचे, या बाबतही माहिती देण्यात येते. घरांच्या मोजणीबरोबरच गावठाणातील मोकळय़ा जागा आणि रस्ते यांचीही मोजणी होते. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून अत्याधुनिक अशा ईटीएस यंत्राचा वापर होणार आहे. या पद्धतीने एका दिवसात संपूर्ण गावठाणाची मोजणी प्रक्रिया करणे शक्य आहे. या कामात सव्र्हे ऑफ इंडिया या संस्थेचे सहकार्य घेण्यात येईल. त्यामुळे मिळकतींची छायाचित्रे अचूक होण्यात मदत होणार आहे. पारंपरिक पद्धतीने या गावांची मोजणी होण्यास तीस वर्षांचा कालावधी लागला असता. आता मात्र तीन वर्षांत गावठाणांची मोजणी पूर्ण होणार आहे.