स्वच्छ भारत अभियानचे सर्वेक्षण पथक मॅनेज
- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा प्रशासनावर गंभीर आरोप
- चिखली, कुदळवाडीचे सर्वेक्षण करण्याची केली मागणी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सत्ताधारी भाजप सरकारने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली आहे. शहरातील उच्चभ्रू वसाहतीच्या भागात स्वच्छ भारतचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. समाविष्ट भागासह मोशी, चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, दापोडी, कासारवाडी, काळेवाडी, थेरगाव भागातील अवस्था अत्यंत विदारक आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान महापालिकेतील प्रशासनाशी मॅनेज झाल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण होणार आहे. स्वच्छतेच्या अधारे शहराला गुणांकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील एक रेल्वे स्टेशन, एक बस स्टॉप, एक चौक, एक रस्ता, एक झोपडपट्टी आदींची पाहणी करून गुणांकन ठरविले जाणार आहे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि आयुक्तांनी कोणत्या भागाची पाहणी करायची याची माहिती संबंधित संस्थेला कळविल्याचे साने यांनी सांगितले आहे. संस्थेचे पथक येणार म्हटल्यावर तेथील जागेची स्वच्छता करण्याचे नियोजन केले आहे. त्याठिकाणची स्वच्छता पाहून संस्थेच्या पथकाला शहराच्या झोपडपट्टी भागातील दुर्गंधीचा अंदाज बांधता येणार नाही. किंवा स्वच्छता गृहांमधील गैरसोयी कळणार नाहीत.
शहराची खरोखर स्वच्छता पाहायची असेल तर त्या पथकाला चिखली, कुदळवाडी भागाची पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी घेऊन यावे. तेथील नाल्यांची दुरवस्था, रस्त्यांची झालेली चाळण, मुता-यांची दुर्गंधी, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनिय अवस्था, रस्त्यावर पडलेला कचरा, महिलांची होणारी हेळसांड पाहून शहराला किती गुणांकन मिळतील याचा अंदाज येईल. परंतु, आयुक्त पथकाला अशा भागात फिरकू देणार नाहीत. नियोजित ठिकाणी नेहून तेथील स्वच्छता दाखवून संबंधित पथक आले तसे परतणार आहे. त्यामुळे शहराची खरी परिस्थितीआहे तशीच राहणार आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान पथकाला आयुक्त मॅनेज झाले आहेत. त्यांनी यापूर्वीच निवडक ठिकाणांची माहिती पथकाला दिली आहे, अशाी टिका साने यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त श्रावण हार्डीकर यांना साने यांनी निवेदन दिले आहे.