राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा उद्यापासून उत्तर महाराष्ट्रात दुसरा टप्पा !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा 10 जानेवारीला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेत व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून झाली. या परिवर्तन संपर्क यात्रेचा पहिला टप्पा अंबरनाथ येथे संपला.
आता दुसरा टप्पा 16 जानेवारीपासून नाशिक येथून सुरू होत असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. कोकणातून या परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली. जवळजवळ पाच दिवस आणि 12 जाहीर सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप-सेनेच्याविरोधात अक्षरशः रान उठवले.
आता बुधवार (16 जानेवारी)पासून दुसरा टप्पा सुरू होत असून यामध्ये 12 जाहीर सभा होणार आहेत. 16 जानेवारी रोजी सिन्नर, इगतपुरी, नाशिक, 17 जानेवारी रोजी दिंडोरी, निफाड, मनमाड, 18 जानेवारी रोजी चाळीसगाव, पारोळा, जळगाव तर 19 जानेवारी रोजी चोपडा, जामनेर आदी ठिकाणाहून निर्धार परिवर्तन यात्रा जाईल.