अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा
नागपुर – 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच राजीनामा दिला आहे. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा ई मेलद्वारे दिला. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर त्यांनी हा राजीनामा पाठवला. यात त्यांनी सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभारही मानले. थेट अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.
यवतमाळमध्ये 11 ते 13 जानेवारीदरम्यान 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मात्र हे साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच वादात अडकलं आहे. मराठीचा मुद्दा उपस्थित करत यवतमाळमधील स्थानिक मनसैनिकांनी ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून विरोध केला. त्यानंतर साहित्य महामंडळाने नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द केलं. मात्र महामंडळाने कचखाऊ भूमिका घेतल्याने अनेक साहित्यिकांनी या संमेलनावर बहिष्कार घातला. श्रीपाद जोशी यांनीच नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द केल्याचा आरोप आहे. त्यांमुळे त्यांच्यावर साहित्यिकांनी टीका केली होती. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद जोशी यांनी पद सोडणं पसंत केलं.
नयनतारा सहगल यांनी मोठ्या आनंदाने संमेलनाचं निमंत्रण स्वीकारलं होतं. पण मराठी साहित्य संमेलनात इंग्रजी लेखिकेला का बोलवावं, असा आक्षेप मनसे कार्यकर्त्यांनी घेतला होता. इतकेच नाही तर इंग्रजी उद्घाटकाच्या हस्ते उद्घाटन होणार असेल तर संमेलन उधळून लावू असा इशाराही देण्यात आला. त्यानंतर हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी सांगितले होते. डॉ. वि. भी. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यंदाचे यजमानपद आहे. त्यातच साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी हे निमंत्रण रद्द करण्यास सांगितलं असल्याचा खुलासा डॉ. रमाकांत कोलते यांनी केला होता.
निमंत्रण रद्द करण्यावरुन श्रीपाद जोशी यांच्यावर अनेक साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली. सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याआधी जोशींनी साहित्यिकांशी चर्चा करायला हवी होती, असेही काही साहित्यिक म्हणाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर त्यांनी हा राजीनामा पाठवला.