उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ: मुख्यमंत्री फडणवीस
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती शब्दांत टीका केली होती. उद्धव यांच्या या टीकेला आपण योग्य वेळ आल्यावर योग्य उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी या विषयावर जास्त न बोलता अत्यंत संक्षिप्त आणि सूचक शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली.
पंढरपूर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी युतीचे जागा वाटप गेले खड्ड्यात आधी शेतकऱ्यांचे पाहा असे थेट वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य वेळी, योग्य उत्तर देऊ असे म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने युतीबाबत प्रतिकूल मत नोंदवलेले आहे. पंढरपूर येथील सभेतही उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत स्पष्ट भूमिका न मांडता भाजपावर टीका केली होती. शिवसेनेचे इतर नेतेही युतीबाबत अनुकूल मत व्यक्त करताना दिसत नाहीत. उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपा आणि पंतप्रधानांवर थेट हल्लाबोल करताना दिसतात. विशेष म्हणजे नेहमी शिवसेनेला भाजपाच्या काही नेत्यांकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. मात्र, भाजपाचे हे नेतेही गेल्या काही दिवसांपासून मौनात आहेत. भाजपाचे नेते युतीबाबत थेट बोलताना दिसत नाहीत. दिल्लीवरूनही भाजपा नेत्यांनी शिवसेनेसोबत थोडेसे नरमाईचे धोरण अवलंबण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीचे काय होणार, मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.