थोडं थांबा… पंधरा लाख रुपयेही खात्यावर जमा होतील – रामदास आठवले
सांगली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या घोषणांपैकी काही पुर्ण झाली आहेत. अन्य राहिलेली घोषणाही लवकरच पुर्ण होतील, त्यामध्ये नागरिकांनो थोडं थांबा, तुमच्या खात्यावर 15 लाख रुपयेही जमा होणार आहेत. आम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे रिझर्व्ह बॅंक पैसे देत नाही. याबाबत बॅंकेशी बोलणे चालू आहे. लवकरच पैसे जमा होतील, असे केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास यांनी सांगितले. ते इस्लामपूरमध्ये ( जि. सांगली) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान हे मंत्र्याना वेळ देतात, ते आमचे सर्व ऐकतात, ते मंत्र्याचे ऐकत नाहीत असे काही नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना कोणता मुद्दा राहिला नाही, त्यामुळे ते असे बोलत आहेत असेही आठवलेंनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ईव्हीएम मशिनला जर विरोध असेल तर निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. मात्र, या निवडणुकीत माशिनद्वारे निवडणुका होतील.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली परंतु, येत्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येऊ आणि राहिलेल्या तीन ते चार महिन्यात काँग्रेसची हवा काढून पुन्हा देशांत नरेंद्र मोदींची सत्ता आणू असे आठवलेंनी स्पष्ट केले. पाच राज्याच्या निवडणुकीवरून भाजप आणि आमचे चिंतन सुरू असून आगामी निवडणुकीसाठी भाजप-सेनेने एकत्र आले पाहिजे. तसेच माझी नेहमीच मध्यस्थाची भूमिका असते त्यामुळे सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, येणाऱ्या निवडणुकीत आरपीआयला लोकसभेला दोन जागा मिळाव्यात म्हणून आग्रही राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.