लष्कराला केवळ रोजगाराची संधी समजणं सोडा, तरचं खरे सैनिक व्हाल : लष्कर प्रमुख
लष्करात भरती होणं हे केवळ रोजगाराची संधी म्हणून पाहणं चुकीचं आहे. लष्करात भरती होण्यासाठी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या कणखर असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही खरे सैनिक होऊ शकता, असे मत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात बीईजीच्या (बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप) कॅम्पसमध्ये आयोजित एका खास कार्यक्रमात ते बोलत होते. देशासाठी लढताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचा यावेळी त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जनरल रावत म्हणाले, लोक लष्कराला एक रोजगाराची संधी असं समजतात आणि भरती होतात. मात्र, असं समजणं हे चुकीचं असून ही गोष्ट पहिल्यांदा आपल्या डोक्यातून काढून टाकली पाहिजे. कारण, एक सैनिक होणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लष्करात भरती होण्यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते तसेच मार्ग काढावा लागतो. अशा परिस्थितीचा समाना करण्याची क्षमता तुमच्या आल्यानंतरच तुम्ही एक सैनिक होऊ शकता. अन्यथा सुखासुखी नोकरी करायची तर रेल्वेत जा, स्वतः चा व्यवसाय करा असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
अनेक अपंग सैनिक हे धडधाकट सैनिकांपेक्षाही चांगली, मोलाची कामगिरी करीत आहेत. अशा अपंग सैनिकांची संख्या किती, देशभरात ते कुठे कुठे आहेत याची माहिती लष्कराकडून गोळा केली जाणार असून त्यांना आवश्यक त्या सवलती, सुविधा देण्यात येणार आहे. जे अपंग असल्याचे खोटे दाखले देतात तसेच अपंगत्वाचा हत्यार म्हणून उपयोग करतात त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवणार असा कडक इशाराही यावेळी जनरल बिपिन रावत यांनी दिला.