समुद्री चाच्यांकडून जहाज लुटण्याचे ४४ प्रयत्न हाणून पाडले : नौदलप्रमुख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/admiral-sunil-lamba.jpg)
भारतीय नौदलाने गेल्या दहा वर्षांत समुद्री चाच्यांकडून होणाऱ्या जहाजांच्या लुटीचे ४४ प्रयत्न हाणून पाडले आहेत. तर १२० दरोडेखोरांना पकडण्यात यश आल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांनी सांगितले आहे. भारतीय नौदल भारताच्या समुद्री सीमांचे दिवस-रात्र डोळ्यात तेल टाकून संरक्षण करीत असल्याची खात्री यावेळी त्यांनी दिली.
अॅडमिरल लांबा म्हणाले, आपली क्षमता वाढवण्यासाठी ५६ युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश करण्याचा विचार नौदल करीत आहे. त्याचबरोबर माच्छिमारांच्या सुमारे अडीज लाख बोटींवर स्वतः ओळख पटवणारे ट्रान्सपोटर लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहितीही लांबा यांनी यावेळी दिली. अदनच्या खाडीत जहाजांच्या लुटारूंपासून बचावासाठी भारत, चीन या देशांसह ३२ देशांची नौदले संयुक्त टेहळणी करीत आहेत. ऑक्टोबर २०१७ मध्ये भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस त्रिशूलने भारताच्या कार्गो जहाजाला लुटण्यापासून वाचवले होते.
अमेरिकी पर्यटक जॉन एलेन चाऊ अंदमानमध्ये झालेल्या हत्याप्रकरणी बोलताना लांबा म्हणाले, मी या प्रकरणाला किनारी सुरक्षेच्या अपयशाच्या दृष्टीने पाहत नाही. चाऊ हे अंदमान आणि निकोबर बेटांवर एक पर्यटक म्हणून आले होते. तसेच त्यांच्याकडे तिथे जाण्याचा परवानाही होता. या प्रकरणाचा तपास अंदमान-निकोबर पोलीस करीत आहेत.
तसेच पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना हवी ती मदत त्यांना पुरवित आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.