Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून व्यक्तिमत्त्व विकास, संस्कार संवर्धन आणि जीवनाला दिशा देणारे केंद्र आहे. आज विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले शिक्षण, मूल्ये आणि संस्कारच उद्याचे जागरूक नागरिक, संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रनिर्माते घडवणार आहेत. शिक्षणाबरोबरच स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असून विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळ, योग आणि संगीतालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ आयोजित करण्यात आला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ.अविनाश ढाकणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत केले. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार व कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन त्यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेल्या ‘विकसित भारत 2047’च्या स्वप्नपूर्तीत आजच्या विद्यार्थी पिढीची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका राहणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल यांनी केले.

हेही वाचा –  विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर! 3 आठवडे चालणार; ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये संगीत आणि योग शिक्षणाला अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपालांनी सांगितले. संगीतामुळे संवेदनशीलता आणि सर्जनशीलता विकसित होते, तर योगामुळे शरीर आणि मन निरोगी राहते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मित्र जोडावेत, एकमेकांकडून शिकावे, एकत्र खेळावे. मोबाईल फोनवर वेळ घालविण्याऐवजी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. खेळामुळे आरोग्य, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होते. निरोगी शरीर आणि निरोगी मन ही यशाची भक्कम पायाभरणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व, संस्कार आणि शिक्षण मजबूत करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. आजच्या युगात कौशल्य विकास, क्रीडा, बहुभाषिक शिक्षण आणि डिजिटल साक्षरता महत्त्वाची असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि आत्मनिर्भर बनविणारे शिक्षण देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका, शाळा प्रशासन, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे राज्यपालांनी कौतुक केले. तसेच पालकांनीही मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन त्यांना स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले.

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यात येत असून भविष्यातील उत्कृष्ट नागरिक घडविण्यासाठी शिकण्याची प्रक्रिया आनंददायी करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळात महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी मागे राहणार नाहीत याची दक्षता घेतली जात असल्याचे सांगून राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई, आयसीएसई अभ्यासक्रमांचे शिक्षण देखील दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षणाबरोबरच संगीत, खेळ यांनाही महत्व देण्यात येत असून दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून उत्कृष्ट नागरिक घडविण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांचे आभार मानताना अतिरिक्त आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी शाळेतील प्रवेश प्रक्रियेचे अवलोकन करून खगोलशास्त्र प्रयोगशाळा, पूर्व-प्राथमिक वर्ग, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा आणि एफएलएन प्रयोगशाळेची पाहणी केली. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच मध्यान्ह भोजनाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button