‘टेक महिंद्रा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स – सायबर सिक्युरिटी’चे उद्घाटन
शिक्षण विश्व: डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड : डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (डीवायपीआययू), आकुर्डी येथे उद्योग–शैक्षणिक सहकार्याला नवे बळ देणाऱ्या ‘टेक महिंद्रा – सेंटर ऑफ एक्सलन्स : सायबर सिक्युरिटी’ या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी व उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि भविष्योन्मुख कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास टेक महिंद्राचे वरिष्ठ अधिकारी पियूष मारवाह (उपाध्यक्ष व समूह वितरण प्रमुख), जसनीत कौर खन्ना (समूह व्यवस्थापक – पीपल सप्लाय चेन), नताशा वर्मा (वरिष्ठ सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ) आणि मेघना आशीष जगताप (ग्लोबल प्रोसेस ऑफिस ऑपरेशन्स लीड) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनीष भल्ला यांच्या हस्ते मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या सायबर सिक्युरिटी प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे नवोपक्रम, कौशल्यविकास आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा – फिफा वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, “नागपूरसह भारतात फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने…”
विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता (प्लेसमेंट व कॉर्पोरेट रिलेशन्स) डॉ. अरुण सचेर यांनी उद्योगाभिमुख शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, हे केंद्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांमधील दरी कमी करण्यास मदत करेल, असे सांगितले. कुलगुरू डॉ. मनीष भल्ला यांनी या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, तांत्रिक कौशल्ये आणि उद्योगक्षेत्रातील तयारी अधिक सक्षम होईल. विशेषतः सायबर सिक्युरिटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होतील.
सायबर सिक्युरिटी, मानव संसाधन व्यवस्थापन, प्रतिभा विकास आणि जागतिक प्रक्रिया व्यवस्थापन या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील मौल्यवान अनुभव आणि मार्गदर्शन दिले. यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नव्या संधींबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचा समारोप जस्मिता कौर यांनी आभार प्रदर्शनाने केला. त्यानंतर समूह छायाचित्र आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
नवीन ‘टेक महिंद्रा – सेंटर ऑफ एक्सलन्स…
सायबर सिक्युरिटी’ हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी प्रगत शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग सहभागाचे प्रभावी व्यासपीठ ठरणार असून, डिजिटल युगातील सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज व्यावसायिक घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे पियूष मारवाह यांनी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास बाळगण्याचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करण्याचा सल्ला देताना त्यांनी सायबर सिक्युरिटीचे तीन मूलभूत स्तंभ – गोपनीयता (कॉन्फिडेन्शिअॅलिटी), अखंडता (इंटिग्रिटी) आणि उपलब्धता (अव्हेलेबिलिटी) – यांचे महत्त्व स्पष्ट केले. याशिवाय त्यांनी एजेंटिक एआय आणि जनरेटिव्ह एआय यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवण्याचे आवाहन केले. सतत शिकण्याची वृत्ती, व्यावसायिक प्रमाणपत्रे मिळवणे आणि प्रभावी संवादकौशल्ये विकसित करणे हे यशस्वी कारकिर्दीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.





