केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय! देशातील बसप्रवास आता अधिक सुरक्षित

पुणे : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देशभरात बससाठी नवीन सुरक्षा नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार बस उत्पादक कंपन्यांना नवीन बसचे उत्पादन करावे लागणार आहे. तसेच नवीन बसचे प्रमाणीकरणही करून घ्यावे लागणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
याअंतर्गत प्रवासी बसच्या बांधणीचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचे पाऊल ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) उचलले आहे. यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला असून, त्यामुळे बस उत्पादक कंपन्यांचा या प्रक्रियेचा वेळ वाचणार आहे. याचबरोबर यासाठी कंपन्यांना येणारा लाखो रुपयांचा खर्च निम्म्याने कमी होणार आहे.
बस उत्पादक कंपन्यांना बसच्या बांधणीच्या प्रमाणीकरणासाठी ‘एआरएआय’ने सुरु केलेल्या विशेष कक्षाच्या माध्यमातून कंपन्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासह इतर बाबींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. बसच्या बांधणीच्या प्रमाणीकरणामध्ये त्रिस्तरीय नियामक चौकट असून, त्यात बसची व्हिडिओ तपासणी आणि प्रत्यक्ष सुरक्षा उपाययोजनांची तपासणी यांचा समावेश आहे. बसच्या प्रमाणीकरणासाठी ‘एआरएआय’ने यासाठी आपल्या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे.
हेही वाचा – राज्यातील सर्व विद्यापीठांचे ‘ऑडिट ; १३ राज्य विद्यापीठांच्या आर्थिक व्यवहारांत येणार सुसूत्रता
अर्ज करण्यापूर्वीच्या टप्प्यापासून ‘एआरएआय’चे पथक कंपन्यांना मदत करीत आहे. बसच्या बाह्य भागाचा विकास करताना तांत्रिक आणि रचनात्मक पाठबळ हे पथक देईल. यामुळे प्रमाणीकरणाची प्रक्रिया जलद होण्यास मदत होणार आहे. देशात प्रवासी सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून बसच्या बाह्य भागासाठी नियमावली लागू करण्यात आली. बसची बांधणी करताना योग्य मानकांचा वापर बस उत्पादक कंपन्यांनी करावा आणि त्या गुणवत्तेचे एकसमान निकष असावेत, हा यामागील हेतू आहे.
ही नियमावली मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीनुसार लागू करण्यात आली. जागतिक पातळीवरील निकषांप्रमाणे देशात सुरक्षा निकष असावेत, असा केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रयत्न आहे. ही नियमावली १३ पेक्षा जास्त प्रवासी क्षमता असलेल्या बससाठी ६ मार्च २०२४ पासून बंधनकारक आहे.





