सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून नागपुरात सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. “भारत हा हिंदू राष्ट्रच आहे, त्यामुळे स्वतंत्रपणे घोषित करण्याची गरज नाही,” असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका कार्यक्रमात भागवत यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेत ही तक्रार करण्यात आली आहे.
२९ एप्रिल रोजी एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या या वक्तव्याचा संदर्भ देत तक्रारदार मून यांनी नमूद केले की, असे विधान भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता, समानता आणि सर्वधर्मसमभाव या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. या वक्तव्यामुळे समाजात धार्मिक ध्रुवीकरण आणि तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पुढाकार; स्वगणनेतून जनगणना मोहिमेला केली सुरुवात
तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या विधानांमुळे देशात वादाचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि संविधानिक मूल्यांबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो. भारत हा विविध धर्म, भाषा आणि संस्कृतींचा देश असून संविधानाने दिलेली धर्मनिरपेक्षतेची संकल्पना ही राष्ट्रीय एकात्मतेची आधारशिला असल्याचे तक्रारदारांनी अधोरेखित केले आहे.
तसेच निवेदनात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेसह कलम १४, १५, २५ ते २८ आणि कलम ५१ (अ) यांचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, भगत सिंग, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी सर्व धर्म आणि घटकांना समान अधिकार असलेला लोकशाही भारत घडवण्यासाठी संघर्ष केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





