‘देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस फेल’; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नियमबाह्य, बेकायदेशीर आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन करत असतात. कायदा माझं काय वाकडं करणार या भूमिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम असतात. देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा एक भयंकर राष्ट्रीय आजार जडलेला आहे, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. सध्याच्या घडीला देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असून हे दोघेही फेल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
२०२३ ला मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक या सरकारने अद्याप अंमलात आणलेलं नाही. त्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे. मगरीचे अश्रू ढाळणं बंद करा. लोक आता फसणार नाहीत. राष्ट्राला संबोधन म्हणजे काय अर्थ होता? एक विधेयक आलं नाही म्हणून राष्ट्राला संबोधन करणं हा मूर्खपणा आहे. निवडणूक काळात प्रसारमाध्यमांचा गैरवापर केला गेला. जे छाती पिटून घेत आहेत, ढोंग करत आहेत त्यांनी २०२३ चं बिल का अंमलात आणलं नाही? मोदींनी कालच्या भाषणात ८६ वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते, त्यांच्या नसानसांमध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस शिवाय देशाला कुणी नेतृत्व देऊ शकत नाही हे मोदी सिद्ध करत आहेत असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिला किती? अंजली दमानियांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात? याकडे देश आता गांभीर्याने पाहत नाही. ५४३ जागा जर दिल्या तर भाजपमधील थोर पुरुषांच्या जागा राखीव होऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावला. मोदींना देश कायम पेटवायचा असतो, मग तो विषय लव्ह जिहादचा असो किंवा कुणी काय खावे यावरून असो. पुलवामामध्ये जवान शहीद झाले, तेव्हा तिथल्या महिलांचा आक्रोश त्यांना दिसला नाही, आता ही ढोंगं त्यांनी बंद करावीत कारण जग त्यावर हसतं आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
टीसीएस (TCS) प्रकरणावरून देशावर संकट आलं असताना, सर्व सूत्रं हिंदूंच्या हाती आहेत, मग ‘हिंदू खतरे मे’ कसे? जर खरोखरच कुणी धोक्यात असेल, तर आम्ही खंबीर आहोत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल आहेत. नरेंद्र मोदींचे ते चेले आहेत. देशात नरेंद्र मोदी फेल आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फेल आहेत. ते फेलच आहेत. ते अपयशीच आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.





