पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका, सरकारचे स्पष्टीकरण

Maharashtra Petrol-Diesel: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर रंगल्या असतानाच, राज्य सरकारने यावर मोठे स्पष्टीकरण दिले आहे. “पेट्रोल खरेदीवर २०० रुपयांची कोणतीही स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू केलेली नाही,” असे सरकारने स्पष्ट केले असून नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बुलढाणासह काही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात इंधन साठ्याबाबत कडक नियमावली जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी इंधनाचा अपव्यय आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी विशेष आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, कोणत्याही पेट्रोल पंपावर बाटली, कॅन किंवा डब्यांमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरले जाईल. यापूर्वीदेखील हा नियम होता. मात्र आता त्याची कडक अंमलबजावणी होणार आहे. गर्दीच्यावेळी रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश पंपचालकांना दिले आहेत.
प्रत्येक पंपावर उपलब्ध साठा आणि मागणीचा फलक लावणे बंधनकारक असून, सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
हेही वाचा – कडक उन्हाळ्यात वीज दरात कपात होणार; येत्या एक एप्रिलपासून नवे दर लागू
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाने स्पष्ट केले आहे की, राज्य स्तरावर इंधन विक्रीवर कोणतीही मर्यादा घातलेली नाही. कोल्हापूर आणि जालना यांसारख्या ठिकाणी अफवांमुळे झालेली गर्दी पाहता स्थानिक प्रशासनाने खबरदारी म्हणून काही ‘तात्पुरत्या’ मर्यादा लावल्या असू शकतात, परंतु तो सरकारी आदेश नाही. इंधनाचा पुरेसा पुरवठा सुरू असून विनाकारण साठा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
टंचाईच्या भीतीने वाहनचालक टाक्या फुल करून घेत असताना अंबरनाथमध्ये एक थरारक घटना घडली. सारंग पोळके नावाच्या वाहनचालकाने आपल्या दुचाकीची टाकी पूर्ण भरून घेतली होती. मात्र, वाढत्या तापमानामुळे आणि टाकी पूर्ण भरलेली असल्यामुळे नवरेनगर बस स्टॉपजवळ त्यांच्या गाडीला अचानक आग लागली. गाडीत पेट्रोल पूर्ण असल्याने आग विझवणे कठीण झाले आणि दुचाकी जळून खाक झाली. उन्हाळ्याच्या दिवसांत टाकी पूर्ण भरून घेणे धोक्याचे ठरू शकते, असा इशाराही या निमित्ताने देण्यात आला आहे.





