सध्याच्या बदललेल्या युगात केस गळणे एक गंभीर समस्या
केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
मुंबई : सध्याच्या बदललेल्या युगात केस गळणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. खासकरून युवकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे अनेकांना कमी वयात टक्कल पजत आहे. लोक केस गळती कमी करण्यासाठी विविध प्रकारचे शाम्पू आणि औषधे वापरतात. मात्र आयुर्वेदिक पद्धतीने केस गळती थांबवता येते का? यासाठी काय करावे लागेल याबाबत पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
केस गळती कमी कशी करायची?
रामदेव बाबांनी केस गळतीच्या प्रश्नावर बोलताना म्हटले की, केस गळती रोखण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत. यासाठी खास तेल वापरू शकता, यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. तेलाने मालिश केल्यास केस गळती कमी होऊ शकते. तसेच योगासन केल्यावरही केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. तुम्हाला गंभीर शारीरिक समस्या नसेल तर तुम्ही शीर्षासन करू शकता. हे आसन केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण वाढते, जेणेकरून केसांची चांगली वाढ होते. याशिवाय तुम्हाला तुमच्या आहारातही बदल करावा लागेल.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन पथकाचे कौशल्यपूर्ण रेस्क्यू!
आहारात आवळ्याचा समावेश करा
रामदेव बाबांनी सांगितले की, ‘आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, यामुळे केसांची वाढ सुधारते. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता. त्याचबरोबर दुधी भोपळ्याचा रस पिणेही केसांसाठी फायदेशीर आहे. तसेच काळे आणि पांढरे तीळाचे सेवन करावे. यात असलेले मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच जवस खाल्ल्यानेही केसांचे आरोग्य सुधारते.
केस गळण्याची कारणे काय आहेत?
रामदेव बाबांनी सांगितले की, केस गळण्यासाठी खराब आहार आणि खराब जीवनशैली कारणीभूत आहे. काही लोकांचे केस अनुवांशिकतेमुळे देखील केस गळू शकतात. बऱ्याच लोकांचे केस कमी वयात गळतात, त्यामुळे बरेच लोक केसांवर रंग लावतात, त्यातील रसायणांमुळेही केस गळती होऊ शकते. त्यामुळे असे प्रकार टाळावेत.
टीप – केस गळती कमी करण्यासाठी कोणताही आयुर्वेदिक उपचार घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.





