भाषेच्या आधारावर मारहाण केल्यास कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी भाषा शिकावी, हा आग्रह योग्य असला तरी त्यासाठी दुराग्रह होऊन कोणी मारहाण करण्याचे प्रकार घडणे सरकारला मान्य नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. भाषेच्या आधारावर कोणीही कोणावरही हल्ला करणे चुकीचे असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, “मराठी शिकण्याची सक्ती आम्ही केली आहे. महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे, असा आग्रह चुकीचा नाही. मात्र, केवळ मराठी बोलता येत नाही म्हणून कोणी मारहाण करत असेल, तर ती कृती आमच्या सरकारला मान्य नाही. अशा घटनांवर आम्ही कारवाई करणारच.”
अलीकडील काळात केवळ मराठी न येण्याच्या कारणावरून काही व्यक्तींवर हल्ले झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याकडे लक्ष वेधत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा – घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाकडून राज ठाकरेंना निमंत्रण
यावेळी मंत्री नितेश राणे यांच्या विधानावरही फडणवीस यांनी भाष्य केले. “नितेश राणे जे बोलले ते चुकीचे आहे. त्यांना वेगळे सांगायचे होते. त्यांचा मुद्दा असा होता की, काही हिंदूंना मराठी येत नाही म्हणून त्यांच्यावर हल्ले होतात, पण इतर भाषिकांवर मात्र असे होत नाही. त्यांच्या म्हणण्यामध्ये काही अंशतः तथ्य असले, तरी भाषेच्या किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करणे योग्य नाही,” असे फडणवीस म्हणाले.
“अशा प्रकारच्या भाषा वापरणे टाळावे आणि समाजात समतेची भावना राखावी,” असा सल्लाही त्यांनी दिला.





