सरकारकडून टोलमध्ये ५० टक्क्यांपर्यंत कपात, ‘या’ राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास होणार स्वस्त….

नवी दिल्ली : सरकारने काही राष्ट्रीय महामार्गांवरील काही भागांच्या टोल दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. यानुसार ज्या राष्ट्रीय महामार्गावर बोगदे, पूल, उड्डाणपूल आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर असतील त्या भागात टोल दरात ५० टक्क्यांपर्यंत कपात जाहीर करण्यात आली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम २००८ मध्ये टोल दर मोजण्याच्या सूत्रामध्ये सुधारणा केली आहे. या बदलासंबंधी २ जून २०२५ रोजी अधिकृतपणे अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे आता टोल मोजण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे आणि यामुळे प्रवाशांचा भार हलका होणार आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत सांगितले आहे की, असे बांधकाम झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भागात दरांची गणना दोन पद्धतीने केली जाईल. नवीन नियमांनुसार, असे स्ट्रक्चर असलेल्या महामार्गाच्या टप्प्यांवर टोलचे दर हे पुढील दोन पद्धतीने मोजले जातील, आणि यापैकी जे कमी असेल त्यानुसार टोलचा दर ठरवला जाईल.
उर्वरित महामार्गाच्या सेक्शनमध्ये (पूल, बोगदा अशी संरचना वगळून) संरचनेच्या लांबीच्या दहा पट जोडून किंवा संरचनेच्या लांबीचा समावेश करून एकूण सेक्शनच्या लांबीच्या पाच पट यामध्ये संरचना (स्ट्रक्चर) म्हणजे स्वातंत्र्य पूल, बोगदा, उड्डाणपूल किंवा एलिव्हेटेड हायवे, असेही या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्रालयाने हे समजावून देण्यासाठी एक उदाहरणदेखील दिले आहे.
हेही वाचा – राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश
जर एखाद्या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी जर ४० किमी असेल आणि तो पूर्णपणे एक संरचना असेल (जसे की बोगदा किंवा पुल) तर १० x ४० = ४०० (संरचनेच्या लांबीच्या १० पट) ५ x ४० = २०० किलोमीटर (सेक्शनच्या एकूण लांबीच्या ५ पट) यापैकी कमी अंतर (२०० किलोमीटर) हे आधार मानून टोल शुल्क आकारले जाईल. यामुळे टोलमध्ये थेट ५० टक्क्यांची सूट मिळते.
हा नियम येण्याच्या आधी अशी संरचना असलेल्या भागात प्रवाशांना प्रति किलोमीटर दहापट टोल द्यावा लागत होता. ज्यामधून त्याच्या निर्मितीचा खर्च वसूल केला जात असे. मात्र, यामुळे प्रवाशांवर भार पडत होता. हे बदल केल्याने त्या प्रवाशांना विशेष लाभ होईल जे लांबच लांब फ्लायओव्हर, बोगदे किंवा एलिव्हेटेड रस्त्यावरून प्रवास करतात. डोंगराळ प्रदेश असलेली राज्य, मेट्रो शहरांच्या बाहेरील बाजूस असलेला आऊटर रिंग रोड, मोठे बोगदे, पूल असलेले रस्ते यावरून प्रवास करणाऱ्यांना याचा लाभ होईल. हा बदल मोठ्या वाहनांसाठी फायदेशीर ठरेल कारण त्यांना प्रवासी वाहानांच्या तुलनेत पाच पट अधिक टोल द्यावा लागतो.





