‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ३ फरार आरोपींचा मर्डर झालाय’; अंजली दमानिया यांचा मोठा दावा

Anjali Damania | बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि फरार आरोपींना अटक करण्यात यावं, यासाठी बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत. तत्पूर्वी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपांचा खून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
काल रात्री मला एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्कमुळे कॉल कनेक्ट होऊ शकला नाही. त्यानंतर त्या इसमाने मला व्हॉईस नोट पाठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण तीन आरोपींचा खून झाला आहे, अशी माहिती या इसमाने दिली. हे ऐकून मी हबकलेच. ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे.
हेही वाचा – विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यापैकी तिघांचा खून झाल्याची माहिती अनोळखी इसमाने दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे. या माहितीची मी खातरजमा केलेली नाही आणि फोन करणारा अनोळखी माणूस कोण आहे, याचीही माहिती नसल्याचे दमानिया म्हणाल्या.
आज बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार नाही. या मोर्चामध्ये सर्व राजकारणी मंडळी आहेत. या मोर्चात शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस सामील होत आहेत. हे सर्व राष्ट्रवादीत असताना त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काय चीज आहे, हे माहीत होते. आधी पक्षात असताना त्यांना हे लोक चालत होते, मात्र आता पक्ष बदलल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे मोर्चे काढत आहेत. हे सर्व राजकारण असून खरंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून वेगळे आंदोलन उभे करण्याची गरज आहे, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.





