मोठी बातमी! मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार
![Manoj Jarange withdraws from assembly elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Manoj-Jarange-Patil-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपुर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली. आता निवडणूक लढणार नाही, पण उमेदवार पाडणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
आम्ही मित्रपक्षांसह चर्चा करत होतो, लढणार होतो. आमचे मतदारसंघही ठरले होते. आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही. मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण हे सांगणार नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाज जर का एकटा लढला, तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा निवडून आणायचं त्यांना आणा. मात्र ज्याला निवडून आणायचं आहे त्यांच्याकडून लेखी घ्या. व्हिडीओही काढून घ्या.
हेही वाचा – विधानसभा निवडणूकीत एकजुटीने लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार!
एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते.
महायुती आणि महाविकास आघाडी कुणाचाही दबाव नाही. कुणीही दबाव टाकला तर मी त्याच्या घरी जाऊन डोक्यात दगड घालेन असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही. मी बदलत नाही, बदलणार नाही. आम्ही तीन ते चार महिने अभ्यास केला होता. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहे. मी मनोज जरांगे एकटा नाही. तर मी म्हणजे आमचा पूर्ण समाज आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.