बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
मदतीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती
![External Affairs Minister S. Shinde asked Chief Minister Shinde to help the students and engineers of the state stuck in Bangladesh. Discussion with Jaishankar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Eknath-Shinde-1-780x470.jpg)
मुंबई | बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते ईत्यादींना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले.
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चेदरम्यान या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. बांगलादेशातील बाधित देशवासीयांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी दिली. बांगलादेशातील भारतीय दूतावासामार्फतही आवश्यक त्या सर्व उपयोजना करण्यात येत आहेत. तिथे अडकलेल्या देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांस, अभियंते किंवा इतर भारतीयास हानी पोहोचणार नाही आणि त्यांना सुरक्षितरीत्या मायदेशात परत आणण्यात येईल. तिथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभियंते यांनाही तातडीने सुरक्षितरित्या परत आणण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – ‘एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता’; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना संपर्क साधणे, मदत उपलब्ध करून देणे यासंदर्भातील कार्यवाहीसाठी राज्यात एक पथकही नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील या बाधितांना जलद गतीने मायदेशात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेदरम्यान सांगितले.
बांगलादेशातील अशांत परिस्थिती निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला होता. यासंदर्भात एकनाथ शिंदे हे परराष्ट्र मंत्रालयाशी सतत संपर्कात आहेत.