मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई-ठाणे जिल्ह्यात सध्या पावसाचा अलर्ट
मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे रुळावर लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा
मुंबई : मुंबई, ठाणे जिल्ह्यात सध्या पावसाचा अलर्ट आहे. असं असताना अचानक मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेष म्हणजे संध्याकाळची चार वाजेची वेळ ही चाकरमान्यांची घरी जायची वेळ असते. लाखो चाकरमानी आपल्या घराच्या दिशेला निघतात. पण अशावेळी अचानक मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली तर चाकरमान्यांचा मोठा हिरमोड होतो. विशेष म्हणजे आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची सेवा अशाप्रकारे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. विशेष म्हणजे सध्या मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे रुळावर लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. लोकल ट्रेन एकाच जागेवर उभ्या राहिल्यामुळे प्रवासी वैतागले आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कल्याणकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल ट्रेन गेल्या अर्ध्या तासापासून रखडल्या आहेत. एका मागे एक अशा लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या आहेत.
विशेष म्हणजे लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील यामुळे रखडल्या आहेत. तर ओव्हरहेडचा स्फोट ऐकून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर जाणाऱ्या लोकल ट्रेन मधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकल ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांना मदत करत थांबलेल्या लोकल ट्रेन मधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेक प्रवासी खाली उतरून रेल्वे रुळावरुन चालत पुढे जात आहेत.