‘नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..’; मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं, मी नारायण राणेंना काही बोलत नाही, शांत आहे. बोलायला लागलो तर मी थांबणार नाही. नारायण राणेंनी मला उगाच धमक्या देऊ नयेत असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्याबाबत नारायण राणे असं म्हणाले होते की त्यांनी आमच्या नेत्यांबाबत बोलू नये. आता नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं त्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
“नारायण राणेंनी काय किंवा इतर कुणी काय मला फुकट धमक्या देऊ नयेत. मी कुणालाही भीत नाही. मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. माझा मराठा समाजही आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. मात्र नवीन काय काढत आहेत? माहीत नाही. गोरगरीबांची सत्ता आणावी असं मला वाटतं. गोरगरीबांचं कल्याण होईल असंच पाऊल मी उचलतो आहे. गरीबांचं कल्याण घडायचं असेल तर सत्तेवरही तेच लोक बसले पाहिजेत.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘मला टार्गेट करून एकटे पाडलं जातय’; हर्षवर्धन पाटील
४० वर्षे, ७० वर्षे कुणी काय दिलं नाही ते सगळ्यांना माहीत आहे. सध्या काय झालं आहे की सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना काहीही सुचत नाही, त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. आपलं सरकार जातं की राहतं याची त्यांना चिंता वाटते आहे. रात्रंदिवस हे भाकरी खातच नाहीत बहुदा ताकच पितात. मला उचकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी त्यांना उत्तर देणार नाही. मी त्यांचासारखा स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही. याचे पाय चाट, त्याचे पाय चाट हे मी करणार नाही. मला मराठा समाजाला मोठं करायचं आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
“मनोज जरांगेंनी आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये. देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर ते बोलले तर आम्ही बोलणारच. आम्ही लोकसभेत काय झालं त्याचं आत्मपरीक्षण करतो आहे.”
“नांदेड, लातूर, बीड, जालना, नगर, पुणे एकही मुलगा आंदोलनातून मागे सरकला नाही. माझ्यापर्यंत आला नाही. आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी तारीख वाढवली किंवा नाही वाढवली तरी आम्ही आता आशा सोडली. आरक्षण देत नाहीत, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करत नाहीत, धनगर बांधवांना सांगितलं होतं की १० टक्के आरक्षण देऊ. त्यांनाही घेऊ देत नाहीत. ओबीसीला धोका दाखवायला लागले आहेत. त्यांचे अभियान सुरू आहेत. फडणवीसांनी दरेकरांच्या मदतीने सुरु केलेले हे अभियान आहेत”, अशी टीकाही मनोज जरांगे यानी केली होती.