‘आदित्य ठाकरे, पार्थ पवारलाही अडकवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता’; अनिल देशमुखांचा आरोप
मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चार दिवसांपुर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे फडणवीसांनीही आपल्याकडे रेकॉर्डिंग्ज असल्याचा दावा केला. यानंतर अनिल देशमुख यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत त्याचे फडणवीसांशी घरोब्याचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.
अनिल देशमुख म्हणाले, तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना मिरजच्या समित कदमला माझ्याकडे ५ ते ६ वेळा पाठवलं. एकदा तो एक बंद पाकीट घेऊन आला होता. मला सांगितलं की याचं प्रतिज्ञापत्र करून द्या. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार अशा अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे. माझ्याकडे ते पाकीट आणणारा माणूस समित कदम होता. मिरज-सांगलीत चौकशी केली तर कुणीही तुम्हाला सांगेल की समीत कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे काय संबंध आहेत.
हेही वाचा – Pune | भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद
ज्या पद्धतीने माझ्यावर हा दबाव टाकला गेला, उद्धव ठाकरेंना खोट्या आरोपात फसवण्याचा दबाव मी समजू शकतो कारण ते राजकीय विरोधक आहेत. पण त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंवरही आरोप करायला सांगितले. तीन वर्षापूर्वी अजित पवार त्यांचे विरोधक होते. त्यामुळे त्यांचं समजू शकतो. पण त्यांचा मुलगा पार्थवरही आरोप करायला सांगितलं. म्हणजे राजकीय विरोधकांच्या मुलांनाही खोट्या आरोपांत कसं अडकवता येईल, याचा प्रयत्न तीन वर्षांपूर्वी केला, असंही अनिल देशमुख म्हणाले.