‘मला भ्रष्टाचाराचे सरदार बोलणाऱ्या अमित शाहांना सुप्रिम कोर्टाने तडीपार केलं होतं’; शरद पवारांचा पलटवार
मुंबई | महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला शरद पवारांनीच संस्थात्मक स्वरूप दिलं, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. अमित शाह यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधून तडीपार केलं होतं आणि आता ते देश चालवतायत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, अमित शाह हे आता देशाचे गृहमंत्री आहेत. ते मागे एका भाषणात म्हणाले होते, शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत. परंतु, देशाच्या गृहमंत्रीपदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं. अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये होते. तेव्हा त्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आहे आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्य करत आहे.
हेही वाचा – भोसरीतील पूरपरिस्थितीनंतर तातडीने औषध व धुरफवारणी करा!
पंतप्रधानांनी मागे म्हटलं होतं की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, त्याचं ते वक्तव्य मी अजिबात मान्य करत नाही. नरेंद्र मोदी एका भाषणात म्हणाले होते की शरद पवार यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि इथवर पोहोचलो. मोदी तसं बोलल्यापासून मी कोणालाही माझं बोट धरायला देत नाही. मला माझ्या बोटावर पूर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कोणाच्याही हातात देणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असतील तर शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं. शरद पवारांची यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जातं. २०१४ ला भाजपा सत्तेत आली, त्यापाठोपाठ मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले, पाठोपाठ मराठा आरक्षण गेलं. त्यामुळे आता काय करायचं ते तुम्ही ठरवा, असं अमित शाह म्हणाले.