Pimpri-Chinchwad | शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत, कारण काय?
पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरात २६ जुलै रोजी दिवसभरात होणारा पाणीपुरवठा नेहमीपेक्षा उशिरा, कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होणार आहे. पवना धरण क्षेत्रात अतिमुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची गढुळता वाढली आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यास विलंब लागत असल्याने तांत्रिक अडचणीमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
पवना धरण आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची गढूळता जास्त प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रावेत पंपिंग हाऊस येथील पंपिंग यंत्रणेत तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे आज दिवसभरात होणारा पाणीपुरवठा नेहमीपेक्षा उशिरा, कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होणार आहे.
हेही वाचा – कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानातील दहशतवाद्यांना इशारा; म्हणाले..
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. तरी दक्षतेची खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.