कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानातील दहशतवाद्यांना इशारा; म्हणाले..
नवी दिल्ली | कारगिली विजय दिनाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धातील शहिदांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना इशारा दिला. तसेच, पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कारगिल विजय दिवस आम्हाला सांगतो की राष्ट्रसाठी दिलेलं बलिदान अमर होतात. दिवस, महिने, वर्षे, शतके जातात, परिस्थिती बदलते पण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्यांची नावे कायम अमर राहतात. हा देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा सदा सर्वदा ऋणी आहे. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. माझं सौभाग्य आहे की कारगिल युद्धाच्या वेळी मी देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपल्या सौनिकांच्या मध्ये होतो.
हेही वाचा – पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका मांडावी; मनोज जरांगे पाटील
मला आठवतंय कशा पद्धतीने आमच्या लष्कराने एवढ्या उंचीवर, एवढं कठीण युद्ध ऑपरेशन लढलं होतं. मी देशाला विजयी करणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना आदरपूर्वक प्रणाम करतो. मी शहीदांना नमन करतो की ज्यांनी कारगिलमध्ये मातृभूमिच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. कारगिलमध्ये आम्ही, फक्त युद्ध जिंकलं नव्हतं तर आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अदभूत परिचय दिला होता, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
तुम्हाला माहिती आहे की भारत जेव्हा शांततेसाठी प्रयत्न करत होता. त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. परंतु, सत्याच्या समोर असत्य आणि आतंक्यांचा पराभव झाला. पाकिस्तानने जेवढे दुप्रयास केले त्या सर्वांना चारी मुंड्या चीत केले. परंतु पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीच धडा घेतला नाही. त्यांनी आतंकवाद्याच्या सहाय्याने प्रासंगिक राहण्याचा प्रयत्न केला. आज मी जेव्हा त्या जागेतून बोलत आहे, जिथे दहशतवाद्यांना माझा आवाज थेट ऐकू जात आहे. मी दहशतवद्यांना सांगू इच्छितो की त्यांचे नापाक मनसबे कधीच यशस्वी होणार नाहीत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.