पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका मांडावी; मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. जरांगेंनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. तर काही दिवसातच ते शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पार करणार आहेत. यापुर्वी मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान केलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, भाजपचे जे नेते टीका करत आहेत ते बिथरले आहेत. त्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांना कळत नाही की मला शांत कसं बसवायचं. मी गोरगरिबांची लढाई लढतो आहे. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागत आहेत. त्यांना आम्ही भाव देत नाही. आम्ही तेव्हाच ओळखलं आहे की यांची बुद्धी कुठपर्यंत आहे. ज्ञान कुठपर्यंत आहे. आपण म्हणतो राजकारणी आहे मोठ्या गाडीत बसतो, चांगले झगे घालतो. पण हे कोणत्या टोकाला चालले आहेत? हे आम्हाला समजलं आहे. हे सगळे छिछोरे, चिल्लर चाळे करत आहेत. मराठ्यांपुढे तुम्ही शांत बसला नाहीत, डिवचत राहिले तर राजकीय करिअर संपणार. मराठा तुम्हाला राजकीयदृष्ट्या संपवणार.
हेही वाचा – कारगिल विजय दिवस : जाणून घ्या कारगिल युद्धासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे..
मी म्हटलं ना ते लोक पागल झाले आहेत. काही दिवसांनी कुठल्याच डॉक्टरांना दाखवून उपयोग होणार नाही. मी आता लक्षच देणं सोडून दिलं आहे. आपला पूर्ण फोकस मिशन २०२४ आहे. सगळी पाडापाडी होणार आहे. सात-आठ दिवस मी शांत आहे मी त्यानंतर माझा हिसका दाखवतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर भूमिका काय? असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचं मी ऐकलं. जर फडणवीस इतकं क्लिअर सांगत असतील तर या तीन नेत्यांनी स्पष्टपणे सांगावं की त्यांची भूमिका नेमकी काय आहे? मराठ्यांना ओबीसीतून आरकक्षण द्यावं हे तिघांनीही सांगावं. जर हे तिघेही म्हणत नसतील तरीही सरकारने बिनधास्त ओबीसींना आरक्षण द्यावं. सरकारने जर मराठा आरक्षण दिलं तर मराठे तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील. काहीही गरज नाही, तुम्ही विचारलं त्यांनी सांगितलं नाही तर तुम्ही आरक्षण द्या, असंही मनोज जरांगे म्हणाले.