Ground Report । अजित गव्हाणेंचा झाला ‘अभिमन्यू’ : माजी आमदार विलास लांडे यांनी बंडाच्या फुग्यातील हवा काढली!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘चक्रव्युव्हात’ अडकले अजित गव्हाणे
![Ajit Gavane got stuck in the 'cycle' of Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/NCP-PCMC-780x470.jpg)
‘महायुती’मध्ये माजी आमदार विलास लांडे यांना विधान परिषदेवर संधी
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजितदादांचा हात सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. गव्हाणे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत भूकंप झाला आणि प्रचंड उलथापालथ झाली, असे चित्र निर्माण केले जात होते. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी गव्हाणेंच्या बंडाच्या फुग्यातील हवा काढून घेतली. त्यामुळे राजकीय चक्रव्यव्हात गव्हाणेंचा ‘अभिमन्यू’ झाला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे.
अजित गव्हाणे यांचे ‘गॉडफादर’ असलेले माजी आमदार विलास लांडे यांना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांत संधी देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. आता लांडे अजित पवारांसोबत झाल्यास भोसरीतील महायुतीची ताकद इंचभरसुद्धा कमी होणार नाही. सुमारे १ लाख मतांचे धनी असलेले विलास लांडे भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विजयाचे शिल्पकार होतील, असे राजकीय जाणकार सांगतात.
हेही वाचा – महाराष्ट्रात दिवसाला ६ शेतकरी आत्महत्या, मागच्या ६ महिन्यात १२६७ शेतकऱ्यांनी संपवले आपले जीवन
‘‘अजित गव्हाणे यांचे काका म्हणून विलास लांडे हेसुध्दा त्यांच्या बरोबर असतील’’अशी सर्वांचीच अपेक्षा होती. लांडे यांची भूमिका अत्यंत महत्वाची समजली जाते. गव्हाणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याला जाहीरपणे दुजोरा दिला होता. पण, आज अजित पवार यांच्याबरोबर पक्षातील माजी नगरसेवकांची एक बैठक पुणे सर्किटहाऊसवर पार पडली. अजितदादांच्या आश्वासनामुळे त्यावेळी लांडे हे जातीने हजर होते. पुढची दिशा २१ जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित मेळाव्यात ठरणार आहे.
काय म्हणाले विलास लांडे?
म्हणाले, विधान परिषदेवर नियुक्तीसाठी अजितदादांकडे मागणी केली, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भाजपमध्ये ४४ वर्षांच्या अमित गोरखे यांच्या सारख्या कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी मिळते, इथे आम्ही ३०-३५ वर्षे लढतोय. आता पुन्हा महापालिका जिंकायची तर विधान परिषद मिळायला पाहिजे, असे वाटते, अशा भावना विलास लांडे यांनी बोलून दाखवल्या.