‘महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनावं’; पंतप्रधान नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-78-1-780x470.jpg)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अनेक कामांचा शुभांरभ करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, ‘माझं ध्येय मुंबईला जगाची थिंक टॅक कॅपिटल बनवायची आहे. महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनावं. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे शौर्याचे साक्षी किल्ले आहेत. इथे सह्याद्रीच्या रांगा आहेत. कोकणातील अथांग समुद्र आहे. कॉन्फरन्स टुरिझम आणि मेडिकल टुरिझमची शक्यता आहे. भारतात विकासाची नवी गाथा लिहिण्याचं काम महाराष्ट्र करत आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हा कार्यक्रम हेच ध्येय गाठण्यासाठी आहे.’
मोदी म्हणाले की, येत्या २५ वर्षात भारताला विकसित करण्यात येणार आहे. यात मुंबईचा मोठा वाटा असेल. मुंबईत सर्वांचा जीवनस्तर सुधारावा, क्वालिटी ऑफ लाइफ चांगलं व्हावं हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे मुंबईतील आसपासची कनेक्टिव्हिटी चांगली करण्याचं काम केलं जात आहे. मुंबईत कोस्टल रोड आणि अटल सेतू पूर्ण झाले आहेत. अटल सेतू बनत असताना त्याविरोधात अनेक गोष्टी फैलवल्या गेल्या. हा सेतू पूर्ण होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. पण आज त्याचा किती फायदा होतोय हे सर्व अनुभवत आहेत. या सेतूवरून रोज २० हजार गाड्या वाहत आहेत. या सेतूमुळे रोज २० ते २५ लाख रुपयांचं इंधन वाचत आहे. एवढंच नव्हे तर लोकांना पनवेल जाण्यासाठी आता फक्त ४५ मिनिट कमी लागतात. म्हणजे वेळेची बचत आणि पर्यावरणाचा फायदा झाला आहे.
हेही वाचा – विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाचेही दोन आमदार फुटले? भाजप नेत्याचा मोठा दावा
मोदी म्हणाले की, ‘आपल्याला मुंबईची वाहतूक सुविधा आधुनिक करत आहोत. मेट्रोच्या विस्ताराचं काम वेगाने सुरू आहे. दहा वर्षापूर्वी मुंबईत केवळ ८ किलोमीटर मेट्रो लाईन होती. आजही ८० किलोमीटर झाली आहे. एवढंच नव्हे तर मुंबईत सुमारे २०० किलोमीटर मेट्रो नेटवर्कवर काम सुरू आहे. भारतीय रेल्वेचा कायापालट होत आहे. त्याचा मुंबई आणि महाराष्ट्राला फायदा होत आहे.’