‘फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…’; शरद पवारांचे मोठे विधान

पुणे : २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी फारकत घेत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीला अडीच वर्षे सत्ता उपभोगता आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार आले. या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. याच घटनांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी भाष्य केले.
शरद पवार यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, देवेंद्र फडणवीस २०१९ आधी म्हणाले होते शरद पवारांचा राजकीय काळ संपला. सध्याचे राजकारण पाहता यावर काय म्हणता येईल? शरद पवारांच्या टप्प्यात आलेल्या या प्रश्नावर त्यांनी चांगलाच सिक्सर मारला.
हेही वाचा – ‘सातत्य आणि स्वप्न बघण्याची वृत्ती असेल तर यश हमखास’; अमित गोरखे
शरद पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस जेव्हा असे म्हणाले होते तेव्हा आम्ही सरकार बदलून दाखवलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कुणी सरकार बनवले… आम्ही लोकांनीच बनविले. कुणाचा काळ संपला हे त्यांना आता कळलंच असेल. इतकंच नाही, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांना सत्ता तर मिळाली पण त्यांना मुख्यमंत्र्याचे नुसते मंत्री व्हावे लागले. त्यामुळे काळ कुणाचा संपला हे मी सांगायला नको.
लोक बोलून जातात, आपण दुर्लक्ष करायचे असते. देवेंद्र यांचे वडिल गंगाधर फडणवीस हे विधानपरिषदेत होते. चांगला माणूस होता. देवेंद्र फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला होता. त्यांच्यात प्रतिभा जाणवत होती. पण आता मात्र मला त्यांची धावपळ पूर्णपणे वेगळी वाटते” अशा शब्दांत शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाचे विधान केले.





