‘‘माझा पक्ष मोरया गोसावी आणि क्रांती चापेकरांची’’; भाऊसाहेब भोईरांनी उभारला बंडाचा झेंडा!
चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार : महायुतीच्या बालेकिल्ल्याचा बुरूज ढासळणार
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि उत्तुंग व्यक्तीमत्व असलेले माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी ‘‘माझा पक्ष मोरया गोसावी आणि क्रांती चापेकरांची’’ अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघाती बलाढ्य बुरूज ढासळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाची निर्मिती झाली. त्यावेळी २००९ मध्ये मला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्र पक्षांची अधिकृत उमेदवारी भाऊसाहेब भोईर यांना मिळाली होती. त्यामुळे या मतदार संघावर माझा अधिकार आहे, असा दावा भोईर यांनी केला आहे.
वास्तविक, मतदार संघाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचा महायुतीच्या उमेदवारीवर पहिला ‘क्लेम’ राहणार आहे. त्यानंतर भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते असे दिग्गज या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या पाठोपाठ भाऊसाहेब भोईर यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपाटले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहेत.
क्रांती करण्याची वेळ आली…
भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- आरपीआय महायुतीच्या माध्यमातून चिंचवडमधून उमेदवारी मिळावी. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. उमेदवारी मिळाली नाही, तर आम्ही माघार घेणार नाही. कारण, आता क्रांती करण्याची वेळ आली आहे. स्व. आमदार लक्ष्मण जगताप हे माझे राजकीय विरोधक असतील, पण आम्ही चांगले मित्र होतो. २००९ मध्ये जगताप विधान परिषद सदस्य होते. मला पक्षाने उमेदवारी दिली. पण, जगताप यांनी अपक्ष फॉर्म भरला. तत्कालीन महापौर त्यांच्या प्रचारप्रमुख झाल्या. त्यामुळे मला पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होती. त्यामुळे मी शिवसेनेशी चर्चा केली. पण, सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले. तयारी करुनसुद्धा मला उमदेवारी मिळाली नाही. २०२४ मध्ये चिंचवड विधानसभेतून तयारी केली आहे. सातत्याने ३० वर्षे समाजासाठी काम करीत आहे. त्यामुळे आता माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्राही भाऊसाहेब भोईर यांनी घेतला आहे. परिणामी, चिंचवडमध्ये क्रांती होणार की, जगतापांचा किल्ला अभेद्य राहणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.