‘गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु’; मनोज जरांगेंचा आरोप
Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिलाय. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकार गोड बोलून माझा काटा काढू पाहतंय असा गंभीर आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. अद्याप दोन ते तीन दिवसांत कुठलाही संवाद सरकारतर्फे झालेला नाही. कुणी संपर्कही केलेला नाही. मी बेमुदत उपोषण सुरु आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, लाडीगोडी लावून बोलत आहेत. गोड बोलून काटा काढायचा असा प्रयत्न असल्याचं दिसतं आहे. एकीकडून म्हणायाचं तातडीने मार्ग काढतो. बेमुदत उपोषण सुरु आहे तरीही पाच दिवस होऊ द्यायचे. यामागे सरकारचा डाव असू शकतो.
हेही वाचा – ‘..तर मोहन भागवत यांनी सरकार खाली खेचावं, त्यांच्यात तेवढी क्षमता’; संजय राऊत
सरकारला मराठ्यांविषयी माया असती तर चार-चार दिवस उपोषण होऊ दिलं असतं का? आम्हाला आमचा फायदा आणि नुकसान कळतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जे पडले नाहीत त्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी थोडं थांबावं. मला खेळवण्याचा खेळ चालला आहे असंच मला वाटतं आहे. मराठे त्यांना तडाखा देतील. डॉक्टर म्हणाले बीपी लो झालं आहे. मी उपचार घेणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.