‘पुढच्या 50 वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली’; रवींद्र धंगेकरांची टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-2024-06-09T171023.577-780x470.jpg)
पुणे : पुण्यात मान्सूनपूर्व पावसाने कहर केल्याचं पाहायला मिळाला. पुण्यातील रस्ते नदीसारखे, बस स्थानकांना तळ्याचं स्वरूप आलंय. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली, पुण्यातील प्रत्येक रस्ता पाण्याखाली गेला होता. तर अनेक ठिकाणी झाडे पडलेली, याचाच धागा पकडत पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर निशाणा साधला. 50 वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
पाऊस झाला मोठा… नालेसफाई घोटाळा झाला खोटा… आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या 50 वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत. पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण “पाऊसच जास्त झाला” असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा… काळजी घ्या, असं ट्विट रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे.
हेही वाचा – ‘तर विधानसभेला घरी बसतील…’; जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
रवींद्र धंगेकर यांनी ट्विटसह पुण्यातील काही व्हिडीओही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पुराच्या पाण्यासारखं पाणी पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरून वाहत आहे. शहरात सुरु असलेला मुसळधार पाऊस यामुळे अग्निशमन दलाकडे सद्यस्थितीत जवळपास 15 ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली असून उर्वरित झाडपडीची संख्या वाढत आहे.
दरवेळी प्रमाणे यंदाही थोडा पाऊस पडला तरी सुतारवाडी स्मशानभूमी व आसपासचा परिसर संपूर्ण जलमय होतो. जवळपास हा रस्ता वाहतुकीसाठी काहीकाळ संपूर्ण बंदच होतो, मयत नेत असतानाही लोकांना थांबावं लागतं. वारंवार प्रशासनाला तक्रार करून देखील योग्य त्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची स्थानिकांनी म्हटलं आहे.