पहिल्यांदाच खासदार, अन् सरळ मोदींच्या मंत्रिमंडळात, मुरलीधर मोहोळ यांना लॉटरी
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांचा मोदी ३ मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत नितीन गडकरी. पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव. रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांना फोन आले आहे. रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे मध्यंतरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अजून भाजप प्रवेश झाला नाही. मात्र, त्यांच्या सुनेला मंत्रीपद मिळत आहे. खडसे परिवार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाला आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात सहभाग होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे.
हेही वाचा – ‘आता माझ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करणार…’, इलॉन मस्क यांनी मोदींच्या विजयाबद्दल अभिनंदन केली मोठी ‘घोषणा’
महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळाले आहे. रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांचे सासरे एकनाथ खडसे भाजपमध्ये जेष्ठ नेते होते. परंतु देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर नाराज होऊन त्यांनी भाजप सोडली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत ते गेले होते. त्यांना शरद पवार यांनी विधान परिषदेतून उमेदवारी दिली होती. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचा अजूनही पक्षात समावेश केला गेला नाही.
रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर त्या प्रायव्हेट विमानाने कुटुंबासह दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. आता रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांना आनंद झाला आहे. परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्रिमंडळात जातोय याचा आनंद गगनाला भिडनारा आहे. त्या केंद्रात मंत्रिमंडळाची शपथ घेणार असल्याने माझे हृदय भरून आले आहे. त्यांनी भाजपमध्ये आणि पक्षश्रेष्ठींवर निष्ठा ठेवली त्याचे हे फळ मिळाले आहे. माझ्याकडे आज बोलायला शब्द नाही मन भरुन आले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.