‘मोदींना शपथ घेऊ द्या, पण सरकार टीकणार नाही’; ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान
![Let Modi take oath but the government will not criticize, said Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Narendra-Modi-2-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीए की इंडिया आघाडी? यावर बरीच चर्चा पाहायला मिळाली. अखेर एनडीएकडे स्पष्ट बहुमत असताना इंडिया आघाडीनं ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यायचं जाहीर केलं. तर येत्या ८ जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि एनडीएचं सरकार पुन्हा स्थापन होईल. यावरून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही राष्ट्रपती भवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहोत. मोदींना शपथ घेऊद्या. पण नंतर खेळ सुरू होईल. हे सरकार चालणार नाही. आम्हाला तर वाटतं मोदींनी शपथ घ्यावी. ८ तारखेला नाही तर आज रात्रीच शपथ घ्यावी, त्यांच्यावतीने आम्ही पेढे वाटू. चंद्राबाबू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो. ते फक्त भाजपाचेच नाही, तर ते सर्व पक्षांचे आहेत. त्यांनी काँग्रेस आणि भाजपाबरोबर काम केलं आहे. मोदींना आघाडी चालवण्याचा किती अनुभव आहे? मोदींचा हम करे सो कायदा आहे. या आघाडीत व्यक्तिमत्त्व किती फिट बसतात हे पाहावं लागेल.
हेही वाचा – इंडिया आघाडीच्या हालचालीनंतर भाजप सतर्क, तातडीने देशभरातील 241 खासदारांना दिल्लीत बोलवलं
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागा मिळवता आल्या आहेत. बहुमतासाठी आणखी ३२ जागांची आवश्यकता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीचे आंध्र प्रदेशमध्ये १६ खासदार निवडून आले आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूचे बिहारमध्ये १२ खासदार निवडून आले आहेत. भाजपाचा आणखी एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे ५ खासदार निवडून आले आहेत. या तीनही पक्षांनी भाजपाला साथ दिली तर भाजपा सहज सत्ता स्थापन करू शकते.