शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राचा कालावधी वाढवला, शिक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा
नवी दिल्ली – सात वर्षांची मर्यादा असलेली शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची मर्यादा कालावधी आता अमर्याद वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षिकी पेशा निवडणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. सात वर्षांच्या आत शिक्षकाची नोकरी नाही लागली तर पुन्हा परीक्षा द्यावी लागायची, त्यामुळे या नव्या निर्णयामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली आहे.
पूर्वलक्षी प्रभावासह २०११ या वर्षांपासून हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी २०११पासूनचे उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहेत. “शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यामुळे रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल”, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं.
शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी आणि करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. २०११ या वर्षानंतर ज्या उमेदवाराचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र बाद झालं आहे. अशा सर्व उमेदवारांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.