इलेक्शन संपले..टोलचे दर वाढविले! मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू
Toll Tax Rate Increase Expressway | लोकसभा निवडणुकांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर देशातील जनसामान्यांना झटका देणारे आणि महागाईत भर घालणारे निर्णय जाहीर झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. टोलच्या दरातील ही वाढ 1 एप्रिलपासून लागू होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती दरवाढ लागू करण्यात आली आहे.
देशभरातील सुमारे १,१०० टोल प्लाझांवरील टोल दरात ३ ते ५ टक्के वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केलेल्या सुचनेनुसार, टोलनाक्याच्या २० किलोमीटरच्या परिक्षेत्रात राहाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी मासिक पासचे दरही वाढविण्यात आले आहेत.
हेही वाचा – भाजपचा ४०० पारचा नारा खरा ठरणार? एक्झिट पोल समोर
रस्ते प्रकल्पांच्या विकासासाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. मात्र, त्याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना टोल दरवाढीबरोबरच महागाई वाढीला देखील सामोरे जावे लागणार आहे.