इतक्या लाख मतांनी जिंकणार, एक्झिट पोलआधी निलेश लंकेंचा मोठा दावा
Ahmednagar Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याच मतदान आज सुरु आहे. अखेरच्या टप्प्यात एकूण 57 लोकसभा मतदारसंघ आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आहे. आज मतदान झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून एक्झिट पोलचे आकडे जाहीर व्हायला लागतील. या एक्झिट पोलच्या आकड्याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. भाजपा प्रणीत NDA की, काँग्रेस प्रणीत INDIA आघाडी जनतेचा कल कुणाकडे ते आज संध्याकाळी स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. भाजपा तिसऱ्यांदा बाजी मारणार की, काँग्रेस परिवर्तनाची लाट आणणार ते पुढच्या तीन दिवसात स्पष्ट होईल. या निकाला संदर्भात प्रचंड उत्सुक्ता ताणली गेली आहे. वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पैजा लागल्या आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. महायुतीमध्ये भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट आहे. महाविकास आघाडीसाठी यंदा महाराष्ट्रातील वातावरण पोषक आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्याने त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये एक सहानुभूती दिसून आलीय. महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळतील असं एक चित्र दिसतय.
हेही वाचा – जून महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँकांना सुट्टी; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
दरम्यान अहमदनगरमध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. महायुतीकडून डॉ. सुजय विखे-पाटील दुसऱ्यांदा खासदार बनण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं आव्हान आहे. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांसोबत होते. पण त्यांनी लोकसभा निवडणूक काळात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेतली. शरद पवार पक्षाकडून त्यांनी लोकसभेच तिकीट मिळवलं.
आज एक्झिट पोल जाहीर होतील, त्याआधी निलेश लंके यांनी मोठा दावा केला आहे. “समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरील निम्मे लोक माझ्यासोबत होते. जवळपास दोन लाख मतांच्या फरकाने आपलाच विजय होईल” असा विश्वास लंके यांनी व्यक्त केलाय. “इतर उमेदवारांसारखे आपले आकडे कमी होत नाहीत, तर वाढतच आहेत, कारण सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे. निवडणूक झाल्याबरोबर आपण इतरांप्रमाणे आराम करण्यासाठी कुठे गेलो नाही” असं निलेश लंके यांनी म्हटलय.