‘जरांगेंच्या आंदोलनाचा मला परभणीत फटका बसला’; महादेव जानकर यांचं विधान
![Mahadev Jankar said that Manoj Jarange's agitation has hit me hard](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Mahadev-Jankar-and-Manoj-Jarange-Patil-780x470.jpg)
Mahadev Jankar | लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झालेले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव हे आमने-सामने होते. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यापुर्वी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.
महादेव जानकर म्हणाले की, परभणीची निवडणूक पार पडल्यानंतर मी महाराष्ट्रात जवळपास ५५ सभा घेतल्या आहेत. या सभांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ दिला. आता मतदान संपल्यानंतर माझ्या मतदारसंघात येवून मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भासह आदी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर परभणीच्या कामांचे प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा – दहावीचा निकाल कधी लागणार? शिक्षण मंत्र्याने दिली माहिती
परभणीच्या जनतेने कोणाला आशीर्वाद दिला हे ४ जून रोजी कळेल. मात्र, मी परभणीच्या जनतेचे आभार मानतो. कारण त्यांनी मला लवकर स्वीकारलं. विकासाच्या मुद्यांवर येथील जनतेनं माझ्यावर प्रेम केलं. यामध्ये सर्व समाजातील लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ४ जून रोजी विजयाचा गुलाल हा माझा असेल असा विश्वास वाटतो. महायुतीला ४२ जागा मिळतील तर महाविकास आघाडीला सहा जागा मिळतील. देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि परभणीचा खासदार म्हणून मी शपथ घेईल, असं महादेव जानकर म्हणाले.
मी विकासाच्या माध्यमातून काम करतो. सब समान तो देश महान हा माझा अजेंडा आहे. माझ्या पक्षातून पहिले दोन आमदार हे मराठा समाजाचे झाले. माझ्या पक्षाचा एक विद्यमान आमदार हा ओबीसी आहे. तसेच काही ठिकाणी मुस्लिम समाजाचे नगरसवेक आहेत. त्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा माझा अजेंडा आहे. मी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला माणनारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. या इराद्याने पुढे चाललो आहे. मात्र, काही प्रमाणात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला फटका बसला, असंही महादेव जानकर म्हणाले.