त्या पीडित कुटूंबियांना भेटण्यास पालकमंत्र्यांना वेळ नसने हे “लांच्छनास्पद”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/sachin-sathi-750x405.jpg)
- काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा संताप
- मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी
पिंपरी, (महा ई न्यूज) – मागील चार वर्षात राज्यात महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि एकूणच गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. 15 ऑगस्टला पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. शहरातील गुन्हेगारांवर अद्यापही जरब बसलेली नाही. गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. मागील पंधरा दिवसात पिंपरी चिंचवड व पुणे परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि खुनाच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरले आहेत, मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
शहरातील विकास कामांची उद्घाटने करुन श्रेय लाटण्यासाठी वेळोवेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट शहरात येतात. परंतू कासारसाई (हिंजवडी), पिंपरी आणि चिंचवड येथील पिडीत कुटूंबियांना भेटण्यास पालकमंत्र्यांना वेळ नाही हे लांच्छनास्पद असल्याची टिका साठे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसने वेळोवेळी पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. 15 ऑगस्ट 2018 रोजी पुरेसे मनुष्यबळ नसतानाही बापट यांच्या उपस्थितीत आयुक्तालय सुरु केले. तरी देखील शहरातील गुन्हेगारी, खून, बलात्कार, बेकायदेशीर धंदे, पार्किंग मधील वाहने तोडफोड व जाळण्याच्या घटना, सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड, सोनसाखळी चोरी व मोबाईल चोरीच्या घटनांवर अद्यापही पोलिसांना नियंत्रण मिळविता आले नाही. पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरु करण्याचा हेतू साध्य झाला नसल्याचे यातून दिसते. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, तसेच कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशीही मागणी साठे यांनी केली आहे.