आतली बातमी, शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात बैठका होऊनही तिढा सुटेना

मुंबई : महायुतीत अजूनही ५ जागांवर तिढा कायम आहे.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलं आहे. पण अजूनही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली. अंतिम तोडगा काढण्यासाठी जवळपास २ तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसले. पण ५ जागांवरील तोडगा काही निघालेला नाही. तर २ जागांवर अंतर्गतच संघर्ष आहे.
अमरावती, वाशिम-यवतमाळ, रामटेक, सातारा, छत्रपती संभाजीनगर या ५ जागांवरचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर माढ्यात भाजपनं पुन्हा रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यावरही मोहितेंसह अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकरांनीही उमेदवार बदला म्हणत उघड विरोध केला आणि बारामतीत, अजित पवारांना शिवतारेंनी आव्हान दिलं असून भाजपकडूनही लढण्यास तयार असल्याचं म्हटलंय.
अमरावतीत भाजपचाच उमेदवार असेल हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. भाजपकडून खासदार नवनीत राणा इच्छुक आहेत. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ दावा सोडण्यास तयार नाही. म्हणजेच इथं भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेत तिकीटासाठी सामना आहे.
हेही वाचा – शिवाजी आढळराव पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
वाशिम-यवतमाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी पुन्हा तिकिटासाठी आग्रही आहेत. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हेत गवळींविरोधात मतदारांची नाराजी असल्याचं समजतंय. त्यामुळे एक तर शिंदेंचेच मंत्री संजय राठोडांना उमेदवारी द्या किंवा भाजप सीट लढवेल असं भाजपनं सांगितल्याचं कळतंय. त्याचपार्श्वभूमीवर संजय राठोडांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेटही घेतलीय.
रामटेकची जागा सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे असून कृपाल तुमाने खासदार आहेत. मात्र रामटेकच्या जागेवर भाजपनंही दावा केलाय. रामटेकमधून काँग्रेसच्या राजू पारवेंना तिकीट देण्याची रणनीती भाजपची आहे. त्यासाठी पारवे फडणवीसांनाही भेटले. मात्र पारवेंना धनुष्यबाणावर लढवण्यासाठी शिंदेंची शिवसेनाही आग्रही आहे.
सातारा लोकसभेत आमचाच उमेदवार असेल अशी घोषणा अजित पवारांनी केलीय. मात्र साताऱ्यातून भाजपचे उदयनराजे इच्छुक आहेत. त्यासाठी उदयनराजे दिल्लीत २ दिवसांपासून ठाण मांडून बसलेत.
छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांचाही दावा आहे. शिंदे गटाकडून मंत्री संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून भागवत कराडांचं नाव आघाडीवर आहे. काही दिवसांआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संभाजीनगरमधून दिल्लीत मोदींसाठी कमळ जाणार असं सांगून भाजपचाच उमेदवार असेल असे संकेत दिले होते.
महाविकास आघाडीचा विचार केल्यास, सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतला तिढा सुटलेला नाही. याबाबतचा नेमका तिढा काय आहे? हे देखील आपण जाणून घेऊयात.





