‘ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच उमेदवारी’; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Untitled-design-22-780x470.jpg)
मुंबई : नितीन गडकरी यांच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता भाजपामध्ये दशकानुदशके आहे, पण त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. मात्र ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, असे म्हणत ठाकरेंनी भाजपावर हल्ला चढवला. तसेच जुमलाचं नामकरण आता गॅरेंटी झालंय पण जुमलेबाज गॅरेंटीला जनता पाठिंबा देणार नाही अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारलं. शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.
आगामी लोकसभा निवणडणूकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. पण बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप त्या कृपाशंकर सिंह यांचं नाव या यादीत आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मुद्यावरून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे.
हेही वाचा – सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
EVM च्या माध्यमातून संभ्रम पसरवला जातोय. जनतेचा या सरकारला कौल नाही. पण जनतेच्या मनाविरुद्ध, EVM चा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला.
नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं नावंही मी जेव्हा ऐकलं नव्हतं, तेव्हापासून मी नितीन गडकरी यांचं नाव ऐकत आलोय. त्यांच्यासोबत कामही केलं. भारतीय जनता पक्षाचे ते एक निष्ठावंत कार्यकर्त आहेत. त्यांनी मुंबई-पुणे रस्ता हे शिवसेनाप्रमुखांच स्वप्नही विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं. पण अशा (गडकरी) माणसाचं नाव भाजपच्या लोकसभा निवणडणूकीसाठीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाही. पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचे आरोप केले, त्या कृपाशंकर सिंह यांचा नाव मात्र भाजपच्या पहिल्या यादीत आहे. हीच आजची भारतीय जनता पार्टी आहे, ही त्यांची आजची स्थिती आहे, असा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.
अशी लोकं त्यांच्या विजयाची छातीठोक गॅरंटी देत असतील. गेल्या काही वर्षांत अनेक नाव बदलली, शहरांची नाव ( या सरकारने) बदलली. तसंच आतात जुमलाच नावही बदललंय. जुमलाचं नामकरण आता गॅरेंटी झालंय. पण या जुमेलबाज गॅरेंटीच्या विरोधात जनता आहे. त्यांना जनता पाठिंबा देणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सुनावलं.