‘..म्हणून राजीनामा दिल्याचं जाहीर केलं’; छगन भुजबळांचा मोठा खुलासा
![Chhagan Bhujbal said that no party had asked for my resignation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Chhagan-Bhujbal-2-780x470.jpg)
मुंबई | मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. यानंतर राज्यभरात गदारोळ निर्माण झाला. राजीनामा दिल्यानंतर याची वाच्यता कुठेही करू नका असं सरकारकडून सांगण्यात आल्यानंतरही छगन भुजबळांनी आपल्या भाषणात जाहीर केलं. मात्र, त्यांनी राजीनामा का दिला? याबाबत मंत्री छगन भुजबळांनी खुलासा केला.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोणत्याही पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण मला वाटत होतं की मी तिथे (ओबीसी एल्गार सभेला) जातोय, तर मला सरकारविरोधात बोलावं लागेल. त्यामुळे मी राजीनामा दिला. परंतु, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले की राजीनामा दिल्याची गोष्ट बाहेर सांगू नका. म्हणून मी पावणे तीन महिने काहीच बोललो नाही.
हेही वाचा – बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील ६००० रुपये; सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?
विरोधकांनी टीका केली की मंत्रिमंडळात बसता आणि सरकारविरोधात बोलता. विरोधकांच्या या टीकेवर मी गप्प बसलो. पण सरकार पक्षातील एक आमदार म्हणाला की भुजबळला लाथ मारून बाहेर काढा. लाथा मारायची भाषा ऐकली तेव्हा मी म्हणालो की राजीनामा दिल्याचं आता नाही सांगणार तर कधी सांगणार? सरकारमधील आमदार म्हणत होते की यांना लाथाडा आणि बाहेर काढा. आणि मी काही बोललो नसतो तर म्हणाले असते किती बेशरम माणूस आहे की खुर्चीला चिकटून बसला आहे. कोणी मला लाथ मारण्याची गरज नाही. त्यामुळे मी म्हणालो की राजीनामा दिला आहे, जा जाऊन तो स्वीकारा, असं छगन भुजबळ म्हणाले.
मराठा समाज शक्तीशाली लोक आहे. त्यांच्यात गरिबी आहे. पण गरिबी कुठे नाही? मला आरक्षण असताना मी आरक्षण घेतलं नाही. मी खूपपूर्वी सवलत घेतली होती. पण मी आणि माझ्या मुलांनी आरक्षण घेतलं नाही. पण तरीही मी लढतोय. कारण, ओबीसी समाजातील ५४ टक्के लोक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना जरा पाठिंबा मिळाला तर ते इंजिनिअर, डॉक्टर बनतात आणि कुटुंबाला पुढे नेतात. पण आता सगळं संपतंय. खोट्या दाखल्यांवर कुणबी लिहिले जात आहेत. ते कुणबी झाले तर ते ओबीसी बनतील. त्यामुळे, आम्ही काय म्हणतोय त्यांना वेगळं आरक्षण द्या. पण हे मागच्या दाराने येत आहेत, असंही छगन भुजबळ म्हणाले.