मराठ्यांनो मुंबईत कसं जायचं? मनोज जरांगे पाटलांनी सांगितला मार्ग
![How do Marathas go to Mumbai? Manoj Jarange Patal told the way](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Manoj-Jarange-Patil-3-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. यासाठी अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. यासाठीचा मार्ग मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, २० जानेवारीला सकाळी ९ अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांनी या पायी मोर्चात सहभागी व्हायचं आहे. आपण शांततेच्या मार्गानं मुंबईत जाणार आहोत. आरक्षण मिळवलं नाहीतर, मराठ्यांच्या मुलांचं प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे कुणीही घरी बसू नये. घरी राहिलो, तर आपल्या मुलांचं वाटोळ होईल. ही शेवटची लढाई आपल्याला जिंकायची आहे. आरक्षण मिळवल्याशिवाय माघारी यायचं नाही.
ट्रॅक्टरमध्ये काय साहित्य घ्यायचं? पाण्याची व्यवस्था कशी आहे? धान्य कसं घ्यायचं? याची सगळी माहिती पीडीएफद्वारे दिली जाईल. एक आचारसंहिता लागू करण्यात येईल. त्याच्या पुढं कुणीही जायचं नाही. फोटो काढण्यासाठी कुणीही गर्दी करायची नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा – ‘आयोध्येचा सातबाराही एखाद्या उद्योगपतीला दिला जाईल’; ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
मुंबईला जाण्याचा मार्ग कसा?
जालना जिल्हा
अंतरवाली सराटी येथून सुरूवात
बीड जिल्हा
शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी
अहमदनगर जिल्हा
पाथर्डी, तीसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव
पुणे जिल्हा
सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजगणाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे-मुंबई एक्स्प्रेसमार्गे लोणावळा
मुंबई
पनवेल, वाशी, चेंबूर, आझाद मैदान.